सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार? | आगळं! वेगळं !!!

सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार?

काल भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात कालच ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे.

त्याचे कारण म्हणजे या मिरवणुकीची काही वैशिष्ट्ये. ही मिरवणूक सकाळी लवकर काढली जाते, जैन समाजातील बहुतांशी मंडळी यात बायकामुलांसह सहकुटुंब सहभागी होतात. अग्रभागी धर्मध्वज, टिपरी पथके, सनई चौघडा, बँड, त्यावर मधूर सुरावटीवर वाजविली जाणारी धार्मिक गीते, महिलांच्याकडून गायली जाणारी धार्मिक गीते, पारंपारिक रथात असलेली भगवान महावीरांची प्रतिमा, संयमित आवाजात केला जाणारा भगवान महावीरांचा जयजयकार या सर्वामुळे पवित्र व मंगलमय अशी वातावरणनिर्मिती अपोआपच होते. ही मिरवणूक खूपच प्रेक्षणीय असते.

त्यामुळे ही मिरवणूक बघायला मला खूप आवडते. आणि त्याचसोबत माझे मन नकळत आपल्या देवी, गणपती अशा धार्मिक उत्सवानिमित्ताने आणि छत्रपती शिवाजी महाराज व इतर सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्ताने काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांशी तुलना करत रहाते.

या आपल्या मिरवणूकांत दुर्दैवाने बघायला मिळतो तो बँड, ढोलीबाजा, बँजो, हलग्या, ताशे अशा वाद्यांचा एकाचवेळी प्रचंड गोंगाट, गदारोळ. आणि हे कमी की काय म्हणून जोडीला डॉल्बी सिस्टीम. मग आता डॉल्बीवर वाजत असलेल्या मोठ्या आवाजातील गाण्यावर तरुणाई थिरकल्याशिवाय कशी राहणार? यात 'मास्टर' असणारांचा अनुभव असा की, थोडी लावल्याशिवाय (मग प्रत्येकाच्या आवडीने व सोयीने ती दारू असेल किंवा गांजा भांग असेल) नाचायचा मजाच येत नाही. त्यामुळे ते 'नशापाणी' अपरिहार्यच! मग त्याच्या अंमलामुळे नाचताना जोर येण्यासाठी जोरजोराने ओरडणे आरोळ्या ठोकणे आलेच. काही प्रसंगी एकमेकांना धक्का लागल्याच्या निमित्ताने मारामारीचे समरप्रसंग ही उद्भवतात, तर काही वेळा सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या अर्वाच्य शिविगाळीवर वाद संपुष्टातही आणले जातात. याच्या जोडीला तोंड रिकामे ठेवणे बहुतेकांना कठीण जाते. मग गुटख्याच्या पुड्या तोंडात सोडल्या जातात. मिरवणूक पुढे गेल्यानंतर आपण जर पहाताल, तर आपल्यायला गुटख्यांच्या रिकाम्या पुड्यांचा सडा आणि पचापच थुंकून काढलेली रांगोळी त्या मार्गावर दिसेल.

त्यामुळे एकीकडे शांत व संयमित आवाजात शांती, प्रेम व अहिंसेचा संदेश देत सहकुटुंब सहभागाने काढल्या जाणाऱ्या पवित्र, धार्मिक व मंगलमय वातावरणातील मिरवणुका तर दुसरीकडे वाद्यांचा कर्णकर्कश गोंगाट, आरडओरडा, भांडणे, शिवीगाळ, कर्कश्य घोषणाबाजी, दारू, गांजा, भांग यांचे नशापाणी करुन गुटखा, तंबाखू सेवन करून केले जाणारे किळसवाणे व हिडीस प्रदर्शन अश्या स्वरूपातील मिरवणुका. असे विषम चित्र आजच्या घडीला सार्वजनिक मिरवणुकांबाबत दिसते आहे.

कुणाकडूनही काही चांगले शिकण्यासारखे असेल ते अवश्य घ्यावे असे आपण नेहमी ऐकतो व दुसऱ्यांनाही सांगतो. तेव्हा जैन धर्मीय बांधवांच्या मिरवणुकीतून आपण चांगले काही का शिकू नये? आणि सध्याच्या ओंगळवाण्या मिरवणुकांचे चित्र का बदलून टाकू नये? याचा विचार विशेषतः तरुण पिढीने करणे आवश्यक आहे किंबहुना आता ही काळाची गरज आहे.

0 Comments:

Post a Comment