अफजल गुरुला फाशी का दिली जात नाही? | आगळं! वेगळं !!!

अफजल गुरुला फाशी का दिली जात नाही?

देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे ही दिरंगाई राष्ट्रपतींच्याकडून नव्हे तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून होत असल्याचे सत्य आता समोर आले आहे.


देशाच्या संसदेवर म्हणजेच देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या या आरोपीला सरकार आणखी किती दिवस जिवंत ठेवणार आहे? यासंदर्भात काही वाहिन्यावर झालेल्या चर्चेतून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे जर या अफजल गुरूला फाशी दिली तर काश्मीर हातचे जाण्याचा धोका आहे, काश्मीर खोऱ्यात दंगली उसळतील, रक्तपात होईल अशी भीती या चर्चेतून व्यक्त केली गेली.

यानिमित्ताने सर्वसामान्य जनतेसमोर प्रश्नांची मालिकाच उभी रहात आहे. या अफजल गुरूच्या अर्जावर निर्णय घेण्याची टाळाटाळ सरकार वर्षानुवर्षे का करत आहे? त्यामागे नेमकी काय कारणे आहेत? मुस्लीम वोटबँक हातची जाऊ नये यासाठी कॉंग्रेस या अफजल गुरूला फाशी देण्यास टाळाटाळ करत आहे, या विरोधकांच्या आरोपात कितपत तथ्य आहे? तथ्य नसेल तर मग ही दिरंगाई कशासाठी? या चर्चेत उल्लेखली गेलेली काश्मीरमध्ये दंगली उसळतील वगैरे वगैरे ही कारणे खरी आहेत का? तसे असेल तर मग या निर्णयावर वेळकाढूपणा करण्याऐवजी सरकार सर्व पक्षांना विश्वासात घेऊन आपली भूमिका का स्पष्ट करत नाही?

आणि या अफजल गुरूला जो नियम लावला जाईल तोच अजमल कसाबलाही लागू करणार काय? कुणीही या देशाच्या संसदेवर हल्ला करा, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ला करा आणि तुम्हाला फासावर लटकवल्यास, कदाचित तुमच्या समर्थकाकडून भडकवल्या जाऊ शकणाऱ्या सूडाग्निच्या वणव्यात देश होरपळू नये म्हणून न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षासुद्धा तुम्हाला देण्यास आम्ही असमर्थ आहोत म्हणून ही शिक्षासुद्धा तुम्हाला माफ! अशी अगतिकता दहशतवाध्यापुढे सरकार व्यक्त करणार आहे का?

अशा प्रकारच्या दहशतवाद्यापुढे, फुटीरतावाद्यापुढे सरकार इतके हतबल झाले आहे का? इतके अगतिक झाले आहे का? अफजल गुरुच्या फाशीला दिरंगाई करून सरकार दहशतवाद्यांना आणि अल्पसंख्याक समुदायाला नेमका कोणता संदेश देऊ पहात आहे? याचा खुलासा कॉंग्रेस सरकारने देशाच्या जनतेसमोर करणे आवश्यक आहे.

0 Comments:

Post a Comment